Tuesday, 24 April 2018

हिशोब एका चुकीचा..


आज पहील्यांदा अचानक गावी जावून आईबाबांना आश्चर्यचकीत करणार होते. मला त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद पाहायचा होता. तब्बल चार महीन्यानी मी गावी जात होते.
'माझ्या असामेंट पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला गावी यायला नाही जमत आहे'
असे अण्णांना सांगून मी मोबाईल बंद केला आणि मी माझी बॅग भरायला घेतली. हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत आमच्याच गावातील सरीता असल्यामुळे मला कधीच आई बाबांना आश्चर्यचकीत करता आले नव्हते. पण कालच सरीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. त्यामुळे हा प्लान मला आखता आला होता.
माझ्या मोबाईलवर सरीताचा कॉल आला तेव्हा नाखुशीनेच मी तो उचलला.
"हॅलो, बोल गं"
"मी पोचले, तुझा काय प्लान आहे, शनिवार रविवारचा?" असे सरीताने विचारल्यावर मी सावध पवित्रा घेतला.
"मी नानेघाटच्या ट्रेकला जातेय, नाईट स्टे आहे" मी ट्रेकला जाते म्हटल्याबरोबर तिने तिचे बोलणे आवरते घेतले.
"ठीक आहे, बरं झालं मी मामाकडे निघून आले ते. मस्त आराम करायचा सोडून कसले ते डोंगर चढता कोणास ठाऊक?" असे बोलून तिने कॉल कट केला.
पिच्छा सुटला एकदाचा हीचा आणि समजा सरीताला बाबांनी कॉल केला असता तरी आई बाबांनाही काही कळणार नव्हते. स्वत:भोवतीच गिरकी घेत मी पलंगावर पडले.
सकाळी ५ वाजताची पुणे - कणकवली बस होती. ती चुकवून चालणार नव्हते.

मी सकाळी हॉस्टेलवरून बाहेर पडले तेव्हा हवेत खुपच गारवा होता. आज खुप दिवसानी सकाळची शुद्ध हवा अनूभवायला मिळत होती. बस अगदी वेळेवर आली होती. जशी बस चालू झाली तस माझं मन भुतकाळात जाऊ लागले. मनात गोड हूरहूर लागून राहीली.

जेव्हा मी डॉक्टर होण्यासाठी पुण्यासाठी गावाहून निघाली होते तेव्हा उर भरून आला होता. सासरी जाणाऱ्या मुलीसारखी मुसमुसत होते मी. शेवटी मला बाबानी पुण्यापर्यंत आणून सोडले होते. सुरूवातीला खुप आई बाबांची खुप आठवण यायची. मी आई बाबांची लाडकी होते. पण अण्णा संस्कार आणि शिस्तीमध्ये कोणतीही तडजोड करत नसत. छोट्याश्या गावी राहून पण मला आज इथपर्यंत घेऊन आले होते. अजुन एका वर्षाने मी डॉक्टर होणार होते. मी डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मी माझी महत्वकांक्षा बनवली. आमच्या कुटूंबाच्या कमाईचे एकमेव साधन असलेली जमिन विकून मला डॉक्टर व्हायचे नव्हते. पण ते काही केल्या ऐकत नव्हते. माझ्या डॉक्टरकी शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांनी रातोरात उभा केला. ज्या जमिनीत हक्काचा संसार होत होता तिथे त्यांना गुलामी करताना मला बघवत नव्हते. लवकरच त्यांना सुखात ठेवणार होते.

बस सकाळी पाच वाजता पुणेहून निघाली पण कणकवलीत पोहोचेपर्यंत खुप लेट झाली. माझी संध्याकाळची शेवटची एस टी ही निघून गेली होती. अंधार पडला होता. आमच्या गावातले रिक्षावाले पण निघून गेले होते. नेमका मोबाईलही बंद झालेला. मी माझ्या कणकवली शहरात राहणाऱ्या मैत्रिणीकडे जायचे ठरवले. तिच्या घराजवळ पोहोचले तेव्हा तिथेही निराशाच पदरात पडली. तिच्या घराला कुलूप होते. मी परत रिक्षा स्टँडला आले. आमच्या गावात जाण्यासाठी इतर रिक्षावाले अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. माझ्याकडे मोजकेच पैसे होते. मी परत एस टी स्टँडला आले. सावंतवाडी बस लागली होती. ही बस आमच्या गावाजवळून जात असली तरी पुढची वाट अंधारातून चालतच जावी लागणार होते. पण नाविलाज होता. पूर्ण रात्र स्टँडला बसून राहू शकत नव्हते. मी सावंतवाडी बस पकडली. तिठ्यावर मर्गजांच्या दुकानावर कोणीतरी सोबतीला मिळेल असा विचार करून बसमध्ये चढले. बाजुलाच एक गृहस्थ मोबाईलमध्ये कालनिर्णय कॅलेंडर ओपन करून पाहत होते. माझा लक्ष आजच्या तारखेकडे गेला. ती रात्र अमावास्येची होती. एरव्ही धीट असणारी थोडी घाबरले. बसमधून उतरल्यावर मर्गजांच्या दुकानावर कोणी नसले तर आपण एकटे कसे जायचे. हा प्रश्न मला सतावत होता. मनात रामरक्षा म्हणत तशीच बसून राहीले. थोड्यावेळाने माझा बसस्टॉप आला तशी मी उतरले. समोर पाहते तर मर्गजांचे दुकान बंद होते. भर थंडीच्या दिवसातही मला घाम फुटला. आई बाबांना आश्चर्यचकीत करायचा प्लान अंगाशी येणार असं वाटू लागले. हायवे वरून जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्स खेरीज कोणताही उजेड तिथे नव्हता. मी हताश झाले होते. माझा मूर्खपणा मला नडला होता. अमावस्येची रात्र , मिट्ट काळोख .. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. तिथून घरापर्यंतचा रस्ता सोपा नव्हता. मी काहीवेळ तशीच बसून राहीले. काय करावे सुचत नव्हते. दुरवर एक घर दिसत होते. तिथे जाऊन मदत मागायची ठरवले. मी माझी मोठी बॅग तिथेच ठेऊन हायवेच्या बाजूने चालायला सुरूवात केली. इतक्यात गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडून कोणीतरी येताना दिसले. मी जागीच थांबले.
ती व्यक्ती माझ्याजवळच येत होती. त्या व्यक्तीने माझ्यावर विजेरीचा प्रकाश टाकला. मी डोळ्यावर हात पकडत समोर पाहीले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या समोर साक्षात माझे बाबा उभे होते.
"अण्णा , तुम्ही इथे कसे?" असे बोलून मी त्यांना बिलगायला गेले तर ते थोडे मागे झाले.
"अगं भारती ,मला हात नको लावूस, मी गावात एकाच्या प्रेतयात्रेला गेलेलो, तिथूनच थेट इकडे आलोय."
"तुम्हाला कसं कळले की मी गावी येणार आहे ते?" माझ्या प्लान जरी फसला असला तरी बाबा मला न्यायला आले होते याचा आनंद खुप होता.
"पोरी मी तुझा बाप आहे, काल रात्री तुला फोन केल्यापासून मला सारखं वाटतं होतं की तु गावी येणार." त्यांचे हे बोल ऐकून मला अगदी भरून आले.
खरचं आई बाबा मुलांच्या बाबतीत मनकवडे असतात. त्यांना मुलांनी न सांगताही सारं कळत असते. मी कीती नशिबवान आहे, असं वाटून गेलं.
मी बाबांच्या मागोमाग चालत राहीले. वाटेत माझीच बडबड चालू होती. बाबा शांतपणे सारं ऐकत होते. तसे आमचे अण्णा मितभाषी. जेवढ्यास तेवढे बोलण्यावर भर. मी मात्र आईसारखी बडबडी झाले होते. थोडे पुढे चालत गेल्यावर एका ठीकाणी वळणावर नदीचा किनारा लागतो तिथे वरून कसला तरी जोराचा आवाज झाला. मी घाबरले. बाबांना पकडायला गेले. पण बाबा मात्र दूर झाले. मुलीला जरी डॉक्टर करायला निघाले असले तरी ते स्वत: मात्र जुन्या विचाराचे होते. घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय मला शिवायला देणार नव्हते. समोर पाहतो तर रस्त्याच्या वरच्या बाजूने दहा ते बारा डुकरांचा कळप खाली येत होता. अण्णा थांबल्याबरोबर मीही थांबले. विचित्र आवाज करत तो कळप नदीच्या दिशेने खाली गेला. छोटीशी घाटी चढून आम्ही आमच्या गावात आलो. आता अण्णांची पावले झपझप पडत होती.
"भारती माझ्यासाठी काय आणलस?" अण्णानी विचारले.
"अण्णा तुमच्यासाठी खादीचे सदरा आणि पायजमा आणलाय" अण्णांचे खादीप्रेम मला चांगलेच ठाऊक होते.
"मला दाखव ना!"
"आता इथे?"
"हो , मला आताच पाहायचे आहे" बाबांचा हट्ट पाहून मी आश्चर्यचकीत झाले.
वाटेतच थांबून बॅग मधून कपड्याची पिशवी बाहेर काढली. माझ्या हातातून ती पिशवी एखाद्या लहान मुलासारखी खेचून घेतली.
"अण्णा काय केलेत हे. तुम्ही शिवलात ना त्या कपड्यांना" मी लटकेच अण्णांना रागवले.
"राहूदे गं, मला आता घालायचे आहेत ते कपडे." अण्णांचे हे असंबद्ध बोलणे मला कळले नव्हते.
"भारती तू हो पुढे, मी जरा जाऊन येतो" पांदीमधुन आमच्या वाडीत शिरलो तेव्हा बाबा हाताची करंगळी दाखवत म्हणाले. कपड्यांची पिशवी मात्र स्वत:जवळ ठेऊन घेतली.

मला आता उजेडाची गरज नव्हती कारण ठीकठीकाणी ग्रामपंचायतीने सौरउर्जेवर चालणारे दिवे लावले होते. मी आईला भेटण्याच्या ओढीने झपाझप चालू लागले. थोडं पुढे गेल्यावर आमचे घर दिसू लागले. आमच्या घरासमोर जमलेली खुप माणसे पाहून मला काहीच कळेना. इतक्यात ढोल वाजायला सुरूवात झाली. माझ्या काळजात धस्स झालं. ढोलाचा विचित्र लय आणि घरातून येणारा रडण्याचा आवाज ऐकून काहीतरी विपरीत घडलेय याची मला खात्री देवून गेला. मी तिथे धावतच पोचले. पडवीतून लोकं अण्णांचे कलेवर धरून अंगणात आणत होते. ते समोरचं दृश्य पाहून मी जागच्या जागी कोसळले. कोणीतरी माझ्याकडे धावताना दिसले.

मला शुद्ध आली तेव्हा मी एका हॉस्पीटलमध्ये होते. कॉटशेजारी माझा मामा आणि मामी बसल्या होत्या. मी उठायचा प्रयत्न केला तसा मामाने मला परत झोपवलं.
मला दोन दिवसापुर्वी घडलेले सारं काही आठवले. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रु थांबायचे नाव घेईनात. दाटून आलेला हुंदका अनावर झाल्यामुळे मी जोरात हंबरडा फोडला. मला समजवताना मामाही मनातून हादरला होता. त्याच दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. आम्ही रिक्षेतून घरी निघालो. माझ्या मनात बरेच प्रश्न आ वासून उभे होते.
अण्णानी या जगातून गेल्यावरही मला दिलेली सोबत मी कधीही विसरणार नव्हते. आता कळत होतं की अण्णा त्यांना न शिवायचे कारण खोटं का बोलले ते.
मी घरी पोचले तेव्हा माझी आई एका बाजूला खोलीत पायात डोकं खुपसून बसली होती. तिच्या चारी बाजूला पातळ सोडून तिला आत बसवली होती. मला पाहून ती ओक्साबोक्शी रडू लागली. मी घरी आल्यावर वाडीतील बऱ्याच बायका जमल्या होत्या. घरातील रडारड काळीज हेलावून टाकत होती. आई थोडी शांत झाल्यावर त्या दिवशी काय झाले ते सविस्तर सांगीतले
"तू गावी येत नाही समजल्यावर अण्णा खुप नाराज झाले होते. त्यांना तू गावी यायला हवं होतं गेले चार पाच दिवस त्यांच्या छातीत दुखत होते. मी हजारदा सांगून पण माझ्यासोबत डॉक्टर जवळ जायला तयार नव्हते. तू आल्यावरच  डॉक्टर जवळ जाईन असा हट्ट धरला होता. नंतर नाराज झालेले अण्णा स्वस्थ न बसता त्यानी सरीताला कॉल लावला जेणेकरून तू खरचं कामात आहेस की आम्हाला आश्चर्यचकीत करण्यासाठी खोटं बोलत आहेस. पण सरीताने अण्णांना तू ट्रेकला जात असल्याचे सांगीतले. ते ऐकून ते खुपच नाराज झाले. त्या रात्री त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. सगळी रात्र तळमळत काढली. सारखे काहीतरी बडबडत होते. मी त्यांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते खूप दुखावले होते. दुसऱ्या दिवशी ते सावंताच्या बागेत कामाला गेले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पीटलमध्ये नेईपर्यंत ते आपल्याला सोडून गेले होते." असे बोलून आई रडायला लागली.
हे सर्व ऐकून मी परत बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने मी सावध होताच मामीने मला पोटाशी कवटाळत कुशीत घेतले. आईने जे काही सांगीतले होते त्यामुळे घुसमट होत होती.
"आई, अण्णांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे" मी असं बोलल्या बरोबर सगळेजण माझ्याकडे पाहू लागले.
"असा नको बोलाव भारती , तुका कायच म्हायत नाय हूता. इतक्या दिवसानी तू गावाक येणार हूतस आणि थोडा आवशी बापाशीक चकीत करूचा वाटला तर तेतूर तुझो काय दोष?" मामी मला कुरवाळत माझी समजूत काढत होती.
"भारती तुझ्या अण्णाना मी फारसा पसंद करत करत नव्हतो. ते माझ्याशी कधीच नीट वागले नव्हते. आमचे मेहूणा - भाओजीचे नाते कधी खुलले नाही. आमचे नीट पटत देखील नव्हते. किंबहूना आमच्या स्वभावातच भिन्नता होती. पण तुझ्या मेडीकल प्रवेशाच्या वेळी ते स्वत:हून माझ्याकडे आले तेही अडचणीत असताना. त्यावेळी त्यांनी जे काही केले ते पाहून मी अवाकच झालो होतो. तुझ्या मेडीकलच्या ऍडमिशन साठी जमिन विकून पण खुप पैसे कमी पडत होते. जमिनीचे पैसे फारसे आले नव्हते. त्यावेळी ते माझ्याकडे पैशाला आले नव्हते. त्यांनी त्यांची एक किडनी विकली होती समोरचा व्यक्ती त्याचे काही पैसे द्यायला टाळाटाळ करत होता. ते पैसे वसूल करण्यासाठी माझी मदत त्यांना हवी होती. राजकीय ओळखीची मदत घेऊन मी ते पैसे मिळवून दिले. ही गोष्ट कोणालाही सांगू नये असं ते म्हणाले. खरतरं आजही ही गोष्ट तुम्हाला सांगणार नव्हतो पण त्यांचा हा त्याग सर्वांना माहीत असायला हवा." मामा बोलता बोलता भावूक झाला होता.
"भारती एक गोष्ट मला खटकतेय, ज्या दिवशी तूझे बाबा गेले त्यादिवशी अंगणात तुळशीच्या बाजूला खादीचा सदरा आणि पायजमा कोणी ठेवला? आणि आम्ही तोच सदरा - पायजमा तूझ्या बाबांना नेसवला. खरंतर आम्ही अंत्ययात्रेच्यावेळी लागणारे कपडे आणायला आम्ही विसरलोच होतो. " मामा माझ्याकडे पाहत म्हणाले.
"मामा, ते कपडे बाबांकडे मी दिले होते" मी पटकन बोलून गेले.
" काय? कधी? ते कुठे भेटले तूला?" सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.
मी गावी येताना घडलेले सारं काही सांगीतले. सगळे जण थक्कच राहीले.
"तूझ्यावर खुप जीव होता गं" आई आपला हूंदका आवरत म्हणाली.
खरं होतं. माझ्यावर त्यांचा खुप जीव होता. पण त्याची शिक्षा मात्र त्यांनाच झाली होती.
मला काहीच समजत नव्हते. मनातून अपराधीपणाची भावना जात नव्हती. अण्णांनी आपली भूमिका मात्र अगदी चोख बजावली होती   आणि मी, माझं कुठे आणि काय चुकलं याचा हिशोब मांडत बसले होते. मन आतल्या आत आक्रंदत होते. अण्णांची मनोमन माफी मागत होते.

समाप्त...
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
( टिप :- ही कथा कल्पनिक असुन कोणत्याही व्यक्तीगत जीवनाशी काहीही संबध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा. )

लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
९००४६०२७६८

Thursday, 12 April 2018

© प्रवास जाणीवेचा..


महिन्यातला पहिलाच सोमवार असल्यामुळे स्टेशनवर बेफाम गर्दी होती. माझा पहिल्या वर्गाचा पास होता. पण क्लास कोणताही असो गर्दीचा त्रास होतोच होतो. मी दादर स्टेशनला उभी होते. बाबांनी हजारदा बजावल्यावर मी पहिल्या वर्गाचा पास काढला होता. मला हे मुळी पटलेच नव्हते. तिप्पट पैसे मोजून पण सीट मिळत नसे.

ट्रेन प्लॅटफॉर्मला आली तशी सगळ्यांची गर्दी झाली. आत शिरायला मिळेना. रेटारेटी झाली. मी सर्वांना ढकलून आत चढायचा प्रयत्न करू लागले. जेमतेम दरवाजाचा दांडा हातात मिळाला. ट्रेन सुटायला लागली. प्लेटफॉर्मवरून एक सावळीशी मुलगी आत चढायला बघू लागली. मला तिचा राग आला. ट्रेन एवढी खचाखच भरलेली असताना ती त्यात चढायचा प्रयत्न करत होती. मी मुद्दाम दारातच राहीले. ती 'मला कर्जतला जायचे आहे प्लीज आत चला' अशी ओरडत होती. दरवाज्यामधील दोन तीन बायका तिच्यावर ओरडल्या. त्यात मी पण तिच्यावर तोंडसुख घेतलं. गाडी चालू असताना सुद्धा ती मुलगी त्या डब्याच्या मागे धावत होती. शेवटी गाडीने वेग घेतला. मी पुढच्या स्टेशनला आत आले. बसायला जागा नव्हतीच. मी आतल्या पॅसेजमध्ये उभी राहीले. मी एकटीच उभी असल्यामुळे बाजुच्या डब्यातून पुरूषांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. त्याकडे दुर्लक्ष करत मी मोबाईलमध्ये मुव्ही बघत राहिले. काही वेळाने पुरूष डब्यात गोंधळ उडाला. थोडे वाकून पाहिल्यावर कळले की सामान ठेवायच्या रॅकवर दोन बांधून ठेवलेले फणस , दोरी तुटल्यामुळे एकाच्या डोक्यावर पडले होते. तो भयंकर चिडला होता. सगळेजण हसत होते. ज्याचे फणस होते तो त्यांना समजावत होता पण ते समजून घेत नव्हते. शेवटी त्या तरूणाने त्यातला एक फणस, फणस डोक्यावर पडलेल्या माणसाला देऊ केला तेव्हा कुठे तो शांत झाला. माझ्या मनात आले, हेच लेडीज डब्यात झाले असते तर? कल्पनाच न केलेली बरी. मी विचार झटकून परत मोबाईल मध्ये गुंतले. त्या डब्यात काही लोक फणसावरून कमेंट पास करत होते आणि आम्ही हसतोय का याची वाट बघत होते. तो तरूण मात्र परत पुस्तक वाचण्यात मग्न झाला. त्याचा शांतपणा मला खुप आवडला. त्याची काहीही चुक नसताना क्लेश टाळण्यासाठी त्याने घेतलेला नम्रपणा मला आवडला. माझं स्टेशन आलं तशी मी उतरून गेले.

माझी ती ट्रेन ठरलेली असायची. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही नेहमीप्रमाणे त्या ट्रेनला खुप गर्दी झाली. कालची मुलगी आज मात्र माझ्याअगोदर चढली होती. माझं लक्ष जेन्ट्सच्या डब्यात गेले. कालचा फणसवाला तरूण पुस्तक वाचण्यात मग्न होता. काळेभोर कुरळे केस, रूंद कपाळ, रंग सावळा पण एखाद्या टिव्ही मालिकेतील हीरोसारखे त्याचे व्यक्तीमत्व होते. ट्रेनमध्ये एवढा आवाज होता तरी तो एकाग्रपणे वाचनात तल्लीन होता. कोणास ठाऊक मला त्याच्याकडे पाहून स्वतःची कीव आली. आपण काही वेळ सोडला तर सतत मोबाईलला चिकटलेलो असतो. शाळेत असताना आपण किती वाचायचो आणि आता व्हॉट्सअपवरच्या मेसेजेस शिवाय वाचन शुन्य. दुसऱ्या दिवशीच मी लायब्ररी लावली. माझ्या आवडते लेखक व पु काळे यांचे पुस्तक घेऊन आले.

दिवसामागून दिवस जात होते. ती कर्जतवाली मुलगी कधीकधी प्लॅटफॉर्मलाच राहू लागली. मला तिचा राग यायचा. कारण महिनाभरापूर्वी सेकंडक्लास मध्ये आम्ही सीट वरून भांडलो होतो आणि गंमत अशी की गर्दीला कंटाळून योगायोगाने त्यानंतरचा मासिक पास दोघांनीही फर्स्ट क्लासचा काढलेला. त्यामुळे आमची गाठ वारंवार पडत होती. तिला ट्रेन पकडता आली नाही की मला आसुरी आनंद व्हायचा. तो तरूण देखील तीच ट्रेन पकडायचा. त्याचा आणि माझा नित्यक्रम सुट्टी व्यतिरिक्त कधी चुकला नाही. मला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटत होते की त्याने एकदाही लेडीज डब्यात डोकावलेले मी तरी पाहीले नव्हते. खरंतर तो मला दादर ते ठाणे दरम्यानच नीट दिसायचा. ठाणे आले की त्याला सीट मिळायची आणि पुढे कुठे उतरायचा ते देखील माहीत नव्हते.

एके दिवशी मला सीट मिळाली नाही पण त्याला जवळून पाहता येईल असे खिडकीजवळ उभे राहता आले. तो कसले तरी जाड पुस्तक वाचत होता. दोन्ही डब्याच्या मधल्या दांडीला हात पकडून तो वाचत होता. त्याच वेळी मी व पु काळेंची 'पार्टनर' ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली होती. माझे कुतुहल जागे झाले. त्याच्याशी मला बोलावेसे वाटत होते. पण कसे तेच कळत नव्हते. एकदा शुक शुक करून पाहिले पण त्याच्या ऐवजी दुसरेच लोक बघायला लागले. मी तो नाद सोडून दिला. थोड्यावेळाने धीर करून त्याच्या बोटाला हात लावला. अनपेक्षीत झालेल्या माझ्या स्पर्शाने तो चमकला. त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर पडलेला प्रश्न पाहून मी त्याला विचारले.
"आज कोणते पुस्तक वाचतो आहेस"
"पॅपिलॉन"
"ओह. कादंबरी आहे का?"
"नाही, एका कैद्याचे आत्मकथन आहे, खुप इंटरेस्टींग आहे" तो म्हणाला.
"पुस्तक थोडा वेळ पहायला देता का?"
"शुअर" असे बोलून त्याने ते पुस्तक मला देऊ केले पण डब्याच्या मधल्या स्टीलच्या दांड्यातील कमी अंतरामुळे ते जाड पुस्तक काही माझ्याकडे येईना.
"राहू दे, नाही येणार ते. फक्त मला फोटो काढता येईल असे पकडून ठेवा. मी फोटो काढते." मी त्या पुस्तकाच्या कव्हर पेजचा फोटो काढला. त्याने परत पुस्तकात डोके खुपसले. खरंतर मला त्याच्याशी अजून बोलायचं होतं.

डोंबिवली आली तशी मी उतरून गेले. त्या दिवसापासून मात्र एक मनासारखी गोष्ट घडली. मी दादरला चढले की नाही हे तो नोटीस करायचा. तेवढाच त्याचा कटाक्ष मला सुखावून जायचा. अंग मोहरून यायचे. असं का होतंय असं मला अजिबात वाटलं नाही. कारण मला माहीत होते की मी त्याच्या प्रेमात पडले होते. अजून मला त्याचे नावही माहीत नव्हते. काय करतो, कुठे राहतो याची काहीच कल्पना नव्हती. माझ्या एकतर्फी प्रेमाची गाडी अशीच पुढे चालली होती. तो फक्त गाडीची दखल घेत होता. गाडीत चढत मात्र नव्हता. पण मला आशा होती तो एक दिवस नक्की येईल. त्याचा आणि माझा प्रवासाचा मुक्काम एक असेल.

एके दिवशी त्याची नजर मला शोधताना दिसली नाही. पहिल्यांदा मी तो आलाय की नाही हे पाहण्यासाठी सगळ्यांना रेटत आत येऊ लागले. पण तो कुठेच दिसला नाही. मी खुप नाराज झाले.

दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याच्या आठवणीने मी खुप बेजार झाले होते. त्याला लवकरात लवकर माझ्या मनातलं सर्व सांगायला हवं. पण तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल? त्याच्याही मनात माझ्याबद्दल काही असेल का? मला प्रश्नावर प्रश्न पडत होते. त्या दोन रात्री कुशी बदलण्यात गेल्या. नाव माहीत नसल्यामुळे फेसबुकला पण शोधू शकत नव्हते आणि तो फेसबुकवर असेल असेही वाटत नव्हते.

आठवड्यातला शेवटचा दिवस होता. मी दादरला ट्रेन मध्ये चढले. नेहमीच्या जागेवर माझी नजर गेली. तो आला होता. त्याची आणि माझी नजरानजर झाली. त्याने दिलेल्या स्माईलला मी मात्र लटका राग दाखवला. त्याने परत हसण्याचा प्रयत्न केला. पण मी मात्र कुसक्यासारखी रूसून बसले. नंतर तो परत पुस्तकात रमला आणि माझ्या रूसव्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुळात मी रूसले आहे हेच त्याला कळले नसणार. ट्रेन रिकामी असल्यामुळे मी आत आले होते. तो वाचनात मग्न होता. त्याच्या बोटाला झालेल्या माझ्या स्पर्शाने त्याने माझ्याकडे पाहीले. मी एक कागदाचा चिटोरा त्याच्या हातात इतक्या बेमालूपणे दिला की कोणालाच काही कळले नाही. पण त्या कर्जतवाल्या मुलीने मात्र पाहिले. मी तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. आमचे कधीतरी पुस्तकावरून बोलणे व्हायचे हे दोन्ही डब्यातल्या लोकांना माहीत होते.

तो कल्याणला उतरून प्लॅटफॉर्मवर थांबला होता. मी मुद्दामच त्याला मी उतरते त्या पुढील स्टेशनला थांबायला सांगीतले. ट्रेनमध्ये बिनधास्त विचार करणारी मी, पण प्रत्यक्षात जेव्हा त्याला भेटायचे आले तेव्हा मात्र मला कापरे भरले.आम्ही स्टेशन जवळच्या हॉटेलमध्ये बसलो. तो अबोल आणि काहीसा लाजरा होता. पण विचारी होता. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. नावाप्रमाणेच श्याम होता. आमचे बोलणे पुस्तकांभोवतीच फिरतेय पाहून माझी चुळबूळ वाढली होती. त्याला माझ्या मनातले भाव सांगायला धीरच होत नव्हता. इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारली. बोलण्यातून ते त्याचे बॉस असावेत असे वाटत होते. थोडा वेळ त्यांचे बोलणे झाल्यावर तो मला बाय करून त्याच्या बॉससोबत निघून गेला. बिल द्यायचे मात्र विसरला नाही. मी जागीच थिजले. यावरून मला एक कळले. त्याच्या मनात माझ्या विषयी काहीही नाहीये.
आजकालच्या संधीसाधू दुनियेत तो वेगळा होता. माझा श्याम. खरचं माझा होईल का? आतापर्यंत कोणालाच भाव न देणारी मी आज का अशी पागल झाले आहे? विचारात गुरफटतच मी बाहेर पडले.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे तो दिसणार नव्हता. त्याला न पाहता एक दिवस काढणेही मला जड जाऊ लागले. सेल्फी जरी काढता आला नसला तरी मी त्याचा फोटो मात्र त्याला न कळत काढला होता आणि तोच फोटो मला विरहात साथ देत होता.

सोमवारी रोजच्या प्रमाणे मी दादरला चढले. त्याच्या डब्यात डोकावून पाहिले तर तो नव्हता. त्याच्या ठीकाणी दुसराच मुलगा उभा होता आणि तो माझ्या कडे पाहून हसत होता. मला त्याचा भयंकर राग आला. थोड्यावेळाने मी आत आले तर श्याम सीटवर बसला होता. त्याला पाहताच भर रणरणत्या वाळवंटात आपल्या चेहऱ्यावर कोणीतरी पाण्याचा फवारा मारावा तशी मी फ्रेश झाले. माझी कळी खुलली. पण ती खुललेली कळी श्याम पाहत नव्हता. त्यामुळे त्याला काहीच अर्थ नव्हता. किंबहूना श्यामला काही फरक पडत नव्हता. त्या दिवशी पण त्याला भेटण्याची इच्छा झाली पण मी स्वतःला सावरले.

दुसऱ्या दिवशी तो परत गायब झाला. माणसाने सांगून तरी जावं ना. असं उचानक गायब होऊन माझी हालत मात्र खराब करत होता. मी खुप बैचेन झाले. माझी बैचेनी मी आईला सांगितली. तेव्हा थोडं बरं वाटले. मन हलकं झालं. असेच दोन तीन दिवस तो गायब होता. तिसऱ्या दिवशी व्हॉटसपवर एक मेसेज आला आणि मी हादरून गेले. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार दाटला.

मी कर्जतला पोहोचले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. मी माझ्या जवळचा पत्ता एका व्यक्तीला विचारला. मी लगेच रिक्षेने सांगितलेल्या पत्त्यावर निघाले. मी लायब्ररी जवळ पोहोचले तेव्हा ती बंद होती. ती चालू व्हायला अर्धा तास होता. मला तो अर्धा तासही मोठा वाटू लागला. शेवटी दहा वाजताची वेळ असलेली लायब्ररी सव्वा दहाला चालू झाली. मी तिथे गेले खरे पण मला हवी ती माहीती मिळायला अडचण येत होती. मी खुप विनंत्या केल्या पण तिथे काम करणारे कर्मचारी आपली ड्यूटी बजावत असताना मला माहीती द्यायला नकार देत होते. अशातच पाउण तास गेला. माझी चिकाटी पाहून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला. मी त्यांच्याशी बोलले. पण ते प्रत्यक्षात येऊनच मला माहिती द्यावी की नाही ठरवणार होते. थोड्या वेळात ते आल्यावरच मला हवी असलेली माहिती मिळाली. मी तिथून निघाले. उन वाढले होते. मी जिथे जाणार होते ते ठीकाण लायब्ररीपासून बरेच लांब होते. तिथे जाणारी बस यायला वेळा होता. माझ्याकडे तेवढी सहनशक्ति उरली नव्हती. मी रिक्षा करून निघाले. तिथे जाताना पायात कापरी भरली होती. रिक्षातून उतरल्यावर मी पत्ता विचारत विचारत जात होते. शेवटी ते ठिकाण आले. वाटेत ठिकठिकाणी फुलांसोबत पैसे पडलेले पाहून मला हुंदका आवरेना. पुढे गेल्यावर अंगणात बांबूच्या काठ्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. एका बाजूला पाण्याने भिजलेले अंगण, अंगणाच्या कोनात मांडलेली विटांची चुल , सारं काही मला अस्वस्थ करत होतं. घराच्या मागच्या बाजूला बायकांचा रडण्याचा आवाज येत होता. सर्व पाहून मला अंगणाच्या कोपऱ्यावरच चक्कर आली. मी खाली कोसळतेय एवढेच मला कळले.

डोळे उघडले तेव्हा मी एका कॉटवर होते. मी डोळे किलकिले करून पाहिले तर एक गृहस्थ मी शुद्धीवर यायची वाट बघत होते. मी शुद्धीवर आल्यावर त्यांनी मला एका ग्लासमधून लिंबूसरबत आणून दिले. पण मी ते घेतले नाही. त्यानी माझी विचारपुस केली. मी रडत रडत त्यांना सगळे काही सांगीतले.
" पोरी रडू नकोस तुझा काहीतरी गैरसमज झालाय."
" म्हणजे?" मी डोळे पुसत पुसत म्हणाले.
" चल , तुला सांगतो सगळे" असे बोलून त्यानी आपली अँक्टिवा बाहेर काढली. मला काहीच कळत नव्हते. मी यंत्रवत त्यांच्यासोबत निघाले. पण त्या अंगणातले दृश्य मात्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. देवाने माझ्याशी एवढे निष्ठूर वागायला नको होते.
 
काही वेळात त्या काकानी आपली अँक्टीवा एका हॉस्पीटलजवळ थांबविली. मला काहीच कळत नव्हते. मी वेड्यासारखी त्यांच्या मागून जात होते. एका वॉर्ड जवळ येऊन ते थांबले आणि मला आत पाठविले. तो जनरल वॉर्ड होता. तिथे भरपुर पेशंट होते. मी वॉर्डच्या दरवाज्यापाशीच उभी होते. त्यांनी मला असं का सोडले तेच कळत नव्हते. मला सैरभैर झालेले पाहून तेच पुढे आले.
" पोरी तुझ्या उजव्या हाताच्या बाजूला थोडं पाहशील का?"
मी माझ्या उजव्या बाजुला पाहीले . माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मगाशी जे वाचलं, जे पाहीलं ते खरं की आता पाहतेय ते खरं? मी हलकेच श्यामच्या पायाला चिमटा काढला. त्याने हलकेच पाय झाडला .श्याम अर्धवट झोपेत होता तो जागा झाला. मला पाहून तो आश्चर्यचकीत झाला होता.
"तू इकडे कुठे?"
मी काहीच बोलले नाही. त्यावेळी मी माझ्या मनाचा कौल ऐकला आणि सगळ्यांसमोर तो झोपलेला असताना त्याला मिठी मारली. त्याने योग्य ते अंतर ठेवायचा प्रयत्न केला पण मी मात्र त्याला घट्ट बिलगले. त्याचा उबदार स्पर्श मला सुखावून गेला. क्षणभर तसाच गेला असेल. डॉक्टर राउंडला आले तशी मी बाजूला झाले. तो आणि त्याच्या घरातील सर्वजण माझ्याकडे पाहतच राहिले. माझ्या सोबत आलेले गृहस्थ मात्र गालात हसत होते. त्यानी मला बाहेर बोलविले. मला श्याम पासून दुर जायचे नव्हते पण चेकअप चालू असताना तिथे थांबू देत नव्हते.
मी आणि ते गृहस्थ बाहेर आलो. समोर ती कर्जतवाली मुलगी उभी होती. मला आश्चर्य वाटले.
"हाय शर्वरी, कशी आहेस?"
माझ्या नावासकट हाक मारलेली पाहून मी आश्चर्यचकीत झाले.
"माझं नाव तुला कसं माहीत?
"बैस इथे, सांगते सर्व"
मी यंत्रवत हॉस्पीटलच्या आवारातील सिमेंटच्या बाकड्यावर बसले.
"मी श्यामची बहीण, स्नेहा. "
हे ऐकून मी उडालेच.
"तुला इथे बघून माझा अंदाज खरा ठरला." असे बोलून स्नेहा मला अजून बुचकळ्यात पाडत होती.
"मला नीट सांगाल का? काय झालयं ते." मी काकुळतीला येऊन म्हणाले.
"तुला माहीती आहे का ,आमचा श्याम मोठ्या नशीबाने वाचलाय. त्या दिवशी श्याम आणि त्याचा मित्र शेखर त्या दोघांच्या मित्राला पहायला ठाण्यामध्ये हॉस्पीटलला गेले होते. त्या दिवशी मला तुम्हा सर्वांच्या कृपेमुळे ट्रेनमध्ये चढताच आले नाही. शेखर आणि श्याम आपली नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी ठाण्याला आले. ठाण्याला दादर पेक्षाही जास्त गर्दी होती. काहीही करून ती ट्रेन त्यांना पकडायची होती. ती कर्जत ट्रेन अशी आहे की एकदा का ती चुकली किंवा पकडता नाही आली की दिड तासाची निश्चिंती. तो वेळ वाचवण्यासाठी आमची धडपड असते. पण सगळीच लोकं समजूतदार नसतात ना. श्याम आणि शेखर पण वेळेत पोहोचण्यासाठी ती ट्रेन पकडायला गेले. पण त्यांना आत शिरता येत नव्हते. श्यामने कसाबसा दांडा पकडला. शेखर पण आत शिरण्यासाठी धडपडत होता. इतक्यात ट्रेन सुटली. शेखरने वरच्या पट्टीला पकडून एक पाय खाली टेकवला. त्याला कम्फर्टेबल वाटत नसावे. तो सर्वांना आत जायला सारखा ओरडत होता. त्याची विनवण्या कोणाच्या कानावर पडत नव्हत्या. पडत असल्या तरी आत चढलेल्या माणसाला बाहेर लटकणाऱ्याची खिसगिणतीही नव्हती. इतक्यात आतून बाहेरच्या बाजूला हलकासा दबाव आला आणि श्यामचा हात सुटला. त्याचा तोल शेखरवर जात दोघेही चालत्या ट्रेनमधून खाली पडले. त्यात शेखर हॉस्पीटलमध्ये दाखल करायच्या आत गेला. श्याम शेखरच्या अंगावर पडल्यामुळे वाचला. श्यामला पायाला झालेल्या किरकोळ दुखापतीखेरीज काही झाले नसल्यामुळे त्याने लगेच लोकांना बोलवून शेखरला कळवा हॉस्पीटलला घेऊन जात असताना त्याने वाटेतच प्राण सोडला."
"पण व्हाट्सअँप वर काही वेगळेच वाचले" मी स्नेहाचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले.
"हो, व्हाट्सअँप वर फिरत असलेला मेसेज मी पण वाचला, शेखरऐवजी श्याम मृत्युमुखी पडला असे लिहीले होते. त्यामुळे तु इकडे आलीस. शेखरचे घर पण आमच्या घराच्या बाजूला आहे ,त्याचे पुढच्या महिन्यात लग्न होते. या सगळ्यासाठी श्याम स्वतःला दोष देतोय. त्याला वाटतेय की त्याचा हात सुटल्यामुळे दोघे पडले. हे खरं जरी असले तरी मला नाही तसं वाटत."
"पोरीनो दोष आहे माणसाच्या मनोवृत्तीचा , आज काल कोणी, कोणाची पर्वा करेनासा झालाय. माणुसकी , समजूतदारपणा नाहीसा झालाय. ठाणे, डोंबिवली , कल्याणकरांसाठी बऱ्याच धीम्या गतीच्या ट्रेन्स असतात, पण काही लोक इच्छीत स्थळी लवकर पोहचण्यासाठी लांब पल्ल्याच्या फास्ट गाड्या पकडतात आणि अगदी बदलापुर ते कर्जत किंवा कसारा आसनगांव वरून रोज पोटाची खळगी भरणारे लोक मात्र खाली राहतात. जे जीवाच्या आकांताने आत घुसतात त्यांचे जीवन असे संपते. प्रत्येकाने थोडा विचार करायची गरज आहे. आपल्या पुरता विचार न करता दुसऱ्याचा विचार करायला हवा. नाहीतर या पुढे असे अनेक शेखर असे जीव तोडणार आहेत. शर्वरी तु म्हणशील एवढे जीव तोडून चढायची काय गरज आहे. गरज आहे म्हणून तर बिचारे चढतात. दूरवर राहणाऱ्या या लोकांचे घरही स्टेशनपासून जवळ नसते. तिथून त्यांना त्यांच्या गावी जायचे असते. त्यासाठीच हा सर्व आटापिटा चाललेला असतो. माझा एक खोपोलीवरून गोरेगांवपर्यंत ये जा करणारा मित्र आहे. तो खोपोलीला उतरून आपल्या गावाहून ये जा करत असतो."
इतक्यात त्या गृहस्थांना कोणीतरी हाक मारली. ते निघून गेले मात्र माझ्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबता थांबत नव्हते. स्नेहाबद्दल मी केलेल्या वाईट विचाराबद्दल , कधी कधी टोचून बोलल्याबद्दल मला खुप अपराधी वाटत होतं. मी पहील्यांदा दुसऱ्याबद्दल विचार करत होते. 
माझा अश्रूंनी भिजलेला चेहरा हातात घेत स्नेहाने मला जवळ घेतले
"शर्वरी , कोणी माणुस वाईट नसतो गं, फक्त त्याला जाणीव करून द्यायची गरज असते. काही माणसे तर सांगून पण ऐकत नसतात. त्यांचे डोळे असं काही गंभीर घडल्यावरच उघडतात. तु तशी नाही आहेस. श्याम मला तुझ्याबद्दल सगळं सांगायचा अगदी तुमच्या कल्याण भेटीबद्दलही बोललाय. त्याचेही तुझ्यावर प्रेम आहे पण पठ्ठ्याने स्वतःहून कधी विचारले नसते." स्नेहाच्या धीराने मला खुप हलकं हलकं वाटतं होते.
इतक्यात श्यामचे आई बाबा वॉर्ड मधून बाहेर येताना दिसले. त्याबरोबर स्नेहाने मला आत जाण्यास खुणावले. मी श्याम जवळ पोचले तेव्हा तो माझीच वाट पाहत असावा. त्याचा हात हातात घेऊन बराच वेळ मुक्याने बसून राहीले. इतक्यात आईचा फोन वाजला.
"हँलो आई"
"शर्वरी, अगं टिव्हीवर बातमी आलीय. त्यानी सकाळच्या रेल्वेअपघाताच्या बातमी बद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. तो श्याम नव्हता
" हो आई , तो श्याम नव्हता.. माझा श्याम जिवंत आहे.." असे बोलून मी श्यामला घट्ट मिठी मारत श्याममय झाले..

समाप्त...
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
( टिप :- ही कथा कल्पनिक असुन कोणत्याही व्यक्तीगत जीवनाशी काहीही संबध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा. )

लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
९००४६०२७६८